
Virat’s For 60 Overs They Should Feel Like Hell Out There & Famous Lords Victory: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) 20 जूनपासून सुरू होतोय. पाच कसोटींच्या या ‘हाय-प्रोफाईल’ मालिकेकडे संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे. बिग 3 पैकी दोन संघ असलेल्या या संघांमधील आजवरचा इतिहास हा तितकाच शानदार असलेला दिसतो. मागील वेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये आल्यानंतर, लॉर्ड्स कसोटी (Lords Test) मध्ये जो अजरामर ‘एपिसोड’ घडलेला त्याचीच ही कहाणी.
WHAT. A. WIN! 👏 👏
Brilliant from #TeamIndia as they beat England by 1⃣5⃣1⃣ runs at Lord's in the second #ENGvIND Test & take 1-0 lead in the series. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/rTKZs3MC9f
— BCCI (@BCCI) August 16, 2021
Virat’s For 60 Overs They Should Feel Like Hell Out There & Famous Lords Victory
राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 ला जिंकलेली पतौडी ट्रॉफी, 2011 ला 4-0 ने खाल्लेला मार आणि त्यानंतर पुढच्या दोन दौऱ्यावर प्रत्येकी एक टेस्ट विजय, अशी कडू-गोड आठवणींची शिदोरी घेऊन विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झालेली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा आणि इंग्लंडला आपल्या घरी बोलावून मात दिल्याचा कॉन्फिडन्स विराटच्या सेनेकडे होता.
वरूणराजाची कृपा ट्रेंट ब्रिजला झाली आणि दीड दिवस पावसामुळे वाया गेल्याने, पहिली टेस्ट ड्रॉ राहिली. दोन्ही संघांना अशी सुरुवात नको होती. दुसऱ्या टेस्टसाठी कारवा पोहचला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. थोड्याशा ढगाळ वातावरणात इंग्लिश कॅप्टन जो रूटने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजासाठी आमंत्रण धाडले. इंग्लंड संघ आणि सामना पाहत असलेल्या सर्वांना अपेक्षा होती की, या वातावरणात भारताची बॅटिंग ऑर्डर कोसळेल. मात्र, रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या डोक्यात दुसरच काहीतरी होत.
ब्रम्हकमळ उगवाव तसं इंग्लंडमध्ये कसोटीच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सेशनमध्ये चक्क एकही विकेट पडली नाही. रोहितने तर काउंटर अटॅकच केला होता. दुसऱ्या सेशनच्या सुरुवातीला तो 83 रन्स करून माघारी परतला. राहुलने फेमस सेंच्युरी मारत ऑनर्स बोर्डवर नाव लिहिले. कॅप्टन विराटनेही महत्त्वाच्या 42 धावा बनवल्या. पहिल्या दिवशी टीम इंडिया पाऊणे तीनशे पर्यंत पोहोचलेली. ती पण फक्त तीन बळी देऊन. दुसरा दिवस मात्र इंग्लंडने सुरुवातीपासूनच नावावर केला. राहुल-रहाणे झटपट गेल्यावर पंत-जडेजाने लुटूपुटूची लढाई करत टीम इंडियाला 364 पर्यंत नेले. सामना रंगवायला हे रन्स तसे पुरेसे होते.
इंग्लंडमध्ये कसोटी, समोर भारत आहे आणि जो रूट खेळणार नाही असं अगदी कधीतरीच घडतं. नेमकं त्या दिवशी तसं घडलं नाही. रोरी बर्न्स 49 आणि जॉनी बेअरस्टो 57 या दोनच शिलेदारांना हाताशी धरत जो रूटने ठोकल शतक. एका बाजूने 9 गडी बाद झाले तरी रूट उभा होता. सात धावांची आघाडी घेऊन इंग्लंड 371 वर असताना शेवटचा जेम्स ऍंडरसन रूटची साथ द्यायला मैदानात आला. इथून सुरू झाला ड्रामा आणि कसोटीत आला ट्विस्ट.
क्रिकेटमध्ये एक अलिखित नियम असा आहे की, तुम्ही 10-11 व्या फलंदाजाला बाउन्सर मारू शकत नाही. खरंतर, गोलंदाजच काळजी घेतात की, आपण याला बाउन्सर मारला तर नंतर हा येऊन आपल्याला बाउन्सर मारेल. त्यामुळे या फंद्यात फारसं कोणी पडत नाही.
गरम खून आणि एका वेगळ्याच फॉर्ममध्ये असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने ती रिस्क घेतली. ब्राम्होस मिसाईल डागावी तसे चार सुपरफास्ट बाऊंसर त्याने ऍंडरसनला मारले. तसा नेहमी कूल असणारा ऍंडरसन त्यामुळे वैतागला. इकडे पंचांनी चार नो बॉल देत भारतीय संघाच्या जखमेवर मीठ चोळलं. मैदानातलं वातावरण चांगलंच तापलं. कॅप्टन रूटने इथेही डोक्यावर बर्फ ठेवला आणि पटापट रन्स काढल्या. अखेर शमीने ऍंडरसनला बोल्ड केला आणि तिथे हा विषय तात्पुरता मिटला. रूटने नॉट आऊट 180 रन्स करत आपला क्लास दाखवला. इंग्लंडला 27 रन्सची नाममात्र आघाडी मिळाली.
टीम इंडियाची दुसरी इनिंग सुरू झाली आणि पहिल्या डावातील सेंचुरीयन राहुल स्वस्तात निपटला. रोहित-विराटला सुरुवात मिळाली पण त्यांच्या गाड्या 21-20 च्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. इथे पुन्हा एकदा उभी राहिली चेतेश्वर पुजारा नावाची भिंत. 206 चेंडू आणि 45 धावा. रहाणेचे दर्जेदार 61 रन्स संघाला तारणारे ठरले. चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोर होता 6 बाद 181.
पाचव्या दिवशी सुरुवातीला दोन खणखणीत फोर मारून रिषभ पंत बाद झाला तेव्हा टीम इंडिया 7 बाद 194 पर्यंत पोहोचलेली. पहिल्या डावाप्रमाणे इंग्लंड पुढच्या 10-15 रन्समध्ये टीम इंडियाचा डाव गुंडाळून आपली इनिंग सुरू करेल, असा सर्वांनी कयास लावला. मात्र, घडलं अनोख. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने 15 रन्स एकत्रित केल्या. इशांत 16 रन्स करून बाद झाला. इंग्लंडच्या विजयाचे चान्स वाढलेले. इशांत माघारी जात असताना जसप्रीत बुमराह मैदानात येत होता. खुद्द बुमराह यालाही याची कल्पना नसेल की, आपल्या करिअरमधील सर्वात यादगार इनिंग खेळण्यासाठी आपण उतरत आहोत.
ऍंडरसनसोबत झालेल्या पंग्यामुळे इंग्लिश खेळाडू बुमराहवर डूख धरून होते. तो आल्या-आल्या त्यांनी त्याला बाउन्सर टाकायला सुरुवात केली. बुमराह हिमतीने त्यांना सामोरा गेला. आपण विजयासाठी खेळतोय की बुमराहला इंजर्ड करायला हेच इंग्लिश गोलंदाजांना समजले नाही. शाब्दिक वाद, बाऊन्सर आणि काही वाऱ्यावर लहरणारे चेंडू असे सर्व वार झेलत बुमराह उभा राहिला. दुसऱ्या बाजूला शमीचा दांडपट्टा सुरू झाला आणि त्याने फक्त बॅट फिरवायचे काम केले. त्याच्या टप्प्यात आला की, तो चेंडू सीमापार पाठवू लागला. टीम इंडियाचा स्कोर भराभर वाढू लागलेला आणि इंग्लंड भानावर आलेली. मात्र, तोपर्यंत त्यांचे बरेचसे नुकसान झालेले.
मोईन अलीला एकाच ओव्हरमध्ये टार्गेट करत शमीने आपली फिफ्टी पूर्ण केली. ज्या क्रिकेटच्या पंढरीवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा अल्टिमेट लिजेंड रिकी पॉंटिंग आणि क्रिकेटचा जीनियस एबी डिव्हिलियर्स यांना फिफ्टी करून लॉर्ड्सच्या दर्दी प्रेक्षकांच्या टाळ्या घेता आल्या नाहीत, ते काम शमीने केलं होतं. इतक्यात लंच ब्रेक झाला. इंग्लंड नवी स्ट्रॅटजी घेऊन दुसऱ्या सेशनमध्ये उतरली. मात्र, विराटने अवघ्या तीन षटकातच टीम इंडियाचा डाव घोषित केला. भारताचा दुसरा डाव होता 298/8 घोषित. शमी आणि बुमराहने नवव्या विकेटसाठी 89 रन्सची नॉट आउट भागीदारी केली आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा थेम्समध्ये बुडवल्या.
नॉट आऊट 56 करून शमी आणि नॉट आऊट 34 करून बुमराह जेव्हा लॉर्ड्सवरून लॉंगरूमकडे चालले होते तेव्हा, फक्त मैदानावरीलच नव्हे तर, टेलिव्हिजनवर सामना पहात असलेल्यांनी देखील त्यांना स्टॅंडिंग ओवेशन दिली. लॉंगरूममधील अस्सल क्रिकेटप्रेमींनी जाताना त्यांची थोपटलेली पाठ आणि टाळ्यांचा झालेला कडकडाट हे दृश्य, भारतीय क्रिकेटमधील एका अविस्मरणीय दृश्यांपैकी एक होते.
"FOR 60 OVERS THEY SHOULD FEEL HELL OUT THERE"
Test Cricket under Virat Kohli was a different gravy 🥶#ViratKohli𓃵pic.twitter.com/Ijg8uQ2QVL
— Dhruv (@ImDhruv_18) December 24, 2023
इंग्लंडला विजयासाठी हव्या होत्या 272 रन्स आणि ओव्हर शिल्लक होत्या फक्त 60. इथून सामना ड्रॉ होण्याची किंवा भारतीय संघ जिंकण्याची शक्यता जास्त होती. इथेच विराट मधला तो वाघ जागा झाला आणि त्याने डरकाळी फोडली. टीम मैदानात उतरली आणि हडलमध्ये विराटने ते प्रेरणादायी शब्द वापरले, “If I See Someone Laughing, Then See! For 60 Overs They Should Feel Like Hell Out There” म्हणजेच, “जर मला कोणी त्यांच्याशी हसताना दिसलं तर मग बघाच! पुढच्या 60 ओव्हर्स त्यांना नरकाप्रमाणे वाटल्या पाहिजेत.” कॅप्टनने दिलेला आदेश सर ऑंखोपर म्हणत भारतीय गोलंदाज आणि फिल्डर्सने लॉर्डसवर अक्षरशः आक्रमण केले.
पहिल्या दोन ओव्हरमध्येच इंग्लंडचे दोन्ही ओपनर खाते न खोलता पव्हेलियनमध्ये पोहोचवण्याचे काम बुमराह आणि शमीने केले. हसीब हमीद तर भारताच्या पेसर्स पुढे थरथर कापताना दिसला. बेअरस्टोनेही स्कोररला फारसा त्रास दिला नाही. टी पर्यंत इंग्लंड 4 बाद 67 अशा नाजूक परिस्थितीत पोहोचलेली. रूटने नांगर टाकलेला आणि बटलर, मोईन अली या चांगल्या बॅटर्सच्या सोबतीला करन आणि रॉबिन्सन हे ऑलराऊंडर बाकी होते. तरीही टीम इंडिया फेवरेट बनली होती. सगळ्याच बॉलर्सला रिदम घावलेला.

टी नंतर खेळ सुरू झाला तेव्हा टीम इंडियाच्या आणि विजयाच्या मधला सर्वात मोठा काटा होता जो रूट. मात्र, या सामन्यात ‘टॉक ऑफ द टाऊन’ असलेल्या जस्सीने टीनंतरच्या तिसऱ्याच बॉलवर त्याला विराटकडे कॅच द्यायला भाग पाडले. त्यानंतर विराटने केलेले सेलिब्रेशन म्हणजे पिक टेस्ट क्रिकेट. टीम इंडियाने अर्धी लढाई जिंकलेली. पुढे बटलर आणि मोईनने 15 षटकांचा संघर्ष केला. इथूनच सुरू झाली ‘मियॉं मॅजिक’. मोहम्मद सिराजने मोईन आणि करन लागोपाठच्या चेंडूवर बाद करत, इंग्लंडचे अवसान घालवले. आता बटलर आणि रॉबिन्सनची लढाई सुरू झाली. मात्र, सगळ्या मोहरा गळून पडल्यानंतर चिल्लर-खुर्दा तरी काय करणार? आधी बुमराहने रॉबिन्सनला आणि पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने बटलरला आऊट करत भारताच्या विजयाची औपचारिकता शिल्लक ठेवली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
संपूर्ण स्टेडियममध्ये इंडिया-इंडियाचे नारे लागायला सुरुवात झालेली. ढोल-ताशे वाजू लागलेले आणि विराट कोहली वेगळाच चार्ज झालेला. ऍंडरसनने त्याच ओव्हरमधील दोन चेंडू कसेबसे खेळून काढले आणि तो क्षण आला. सिराजने त्याचा स्टंप वाचवला आणि लॉर्ड्सवर अक्षरशः दिवाळी सुरू झाली. भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक एका वेगळ्याच उत्साहाने हा विजय साजरा करत होते. इंग्लंडने फक्त 120 धावांत आणि आठ ओव्हर राखून टीम इंडिया पुढे लोटांगण घातलेले. कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी असणारा हा विजय क्रिकेटच्या पंढरी साकार झालेला, आणि तेव्हा विराटने उच्चारलेले “For 60 Overs They Should Feel Like Hell Out There” हे शब्दही अजरामर झालेले.
हे देखील वाचा: Headingley Test 2002: भारतीय क्रिकेटमध्ये का ‘स्पेशल’ मानली जाते 2002 ची हेडिंग्ले कसोटी? नक्की काय घडलं होतं?
Jelly Bean Controversy: काय होता 2007 इंग्लंड दौऱ्यावरचा जेली बीन विवाद? त्यानंतर झहीरने केलेला कहर