
Jelly Bean Controversy 2007: टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा सर्व क्रिकेटचाहते व्यक्त करत आहेत. या दोन्ही संघातील कसोटी सामने नेहमीच रंगतदार होत असतात. त्याचबरोबर मैदानावर उभय संघातील खेळाडूंमध्ये देखील वाद झालेले. त्यातीलच काही मोजके आणि गाजलेले वाद आपण जाणून घेत आहोत. त्यातील पहिला वाद म्हणजे 2007 च्या इंग्लंड दौऱ्यातील जेली बीन विवाद (Jelly Bean Controversy).
England v India Jelly Bean Controversy 2007
2007 च्या वनडे वर्ल्डकपमधून टीम इंडियाला लाजिरवाणी एक्झिट घ्यावी लागलेली. भारतीय क्रिकेट संघावर चाहत्यांचा रोष होता. याच सगळ्या परिस्थितीत भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये पोहोचलेला. इंग्लंड विरुद्ध तीन कसोटी आणि सात वनडे तसेच स्कॉटलंडविरुद्ध काही वनडे सामने या संपूर्ण दौऱ्यात खेळायचे होते. विशेष म्हणजे टीम इंडिया विना प्रशिक्षक इंग्लंडला आलेली. वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग या दोन्ही मॅचविनरची जागा खराब फॉर्ममूळे गेलेली. इंग्लंड दौऱ्यावर पराभव झाल्यास भारतीय क्रिकेटमध्ये आणखी मोठा भूकंप होणार याची सर्वांना खात्री होती.
इंग्लंडमध्ये टीम इंडियाची कामगिरी म्हणावी तशी नव्हती. साहेबांच्या देशात भारताने शेवटची टेस्ट सिरीज 1986 ला जिंकलेली. संघाचे एकंदरीत हाल पाहता, चाहते आणि समीक्षकांना फारशी काही अपेक्षा नव्हती. लॉर्ड्सवर पहिल्या कसोटीत झाले तसेच. गोलंदाजांनी जीव लावला पण, वर्ल्डकपप्रमाणे फलंदाजांनी कच खाल्ली. दुसऱ्या इनिंगमध्ये धोनीच्या 76 धावांमुळे कशीबशी ती कसोटी ड्रॉ झाली. जगभरात टीम इंडियाच्या डाऊनफॉलची चर्चा सुरू झालेली.
अशात दुसरी टेस्ट होती नॉटिंगहॅमला. कर्णधार राहुल द्रविडने त्या ढगाळ वातावरणात आणि पावसामुळे काहीशा ओल्या झालेल्या पिचवर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवण्याचा विडा उचलला. भारताच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या झहीर खान (Zaheer Khan) याने पुढे होत 4 इंग्लिश फलंदाज माघारी पाठवले. अनिल कुंबळेने वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या त्या पिचवर आपल्या फिरकीची जादू चालवत 3 फलंदाजांना टिपले. घरच्याच मैदानावर इंग्लंड 198 वर ऑल आऊट झाली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
इंग्लंड स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियाच्या फलंदाजांना एक सुवर्णसंधी दिसली. मोठी धावसंख्या उभारून मोठी लीड घेण्याचा मनसुबा भारतीय संघाचा होता. टीम इंडियाने जसा विचार केला तसेच घडले. भारताच्या तब्बल पाच फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. मास्टर ब्लास्टर सचिनने सर्वाधिक 91, दादा गांगुलीने 79, युवा दिनेश कार्तिकने 77, सलामीवीर वसिम जाफरने 62 आणि लक्ष्मणने 54 धावा केल्या. टीम इंडियाची धावसंख्या होती 481 आणि लीड 283 ची. टीम इंडिया सामन्यात फेवरेट झाली होती.
मात्र, भारतीय संघाच्या याच डावात इंग्लंड विरुद्ध भारत (ENG IND) यांच्यातील कसोटी सामन्यांच्या इतिहासातील एक चर्चित वाद झाला. सातव्या विकेटच्या रूपात लक्ष्मण बाद झाला तेव्हा झहीर खान फलंदाजीला आला. तो स्ट्राइक घेणार इतक्यात त्याला दिसले की, खेळपट्टीवर काही जेली बीन्स पडल्या आहेत. त्याने त्या जेली बीन्स बाजूला केल्या आणि खेळू लागला. ते षटक संपल्यावर त्याने पुन्हा एकदा पाहिले की, खेळपट्टीवर जेली बिन्स आहेत. हे कोणीतरी मुद्दाम करतेय, हे त्याला समजून चुकले व त्याने पंचांकडे तक्रार केली. इतक्यात स्लीपमध्ये असलेला केविन पीटरसन (Kevin Pietersen) काहीतरी बोलताना त्याला दिसला. झहीर थेट बॅट घेऊन त्याच्याकडे गेला आणि असे न करण्यास सांगितले. झहीरचा रोख हा पीटरसन व एलिस्टर कूक यांच्याकडे होता.
पीटरसन म्हणजे इंग्लंड संघातील सर्वात बोलका आणि स्लेजिंग मध्ये पुढे असलेला भिडू. त्याने सरळ आपण असे काहीच करत नसल्याचे म्हटले. झहीरचा पारा याने वाढला आणि तो पुन्हा एकदा बॅट घेऊन त्याच्याकडे जाऊ लागला. त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण तात्पुरते मिटवले. थोड्याच वेळात भारताचा डाव संपला. इंग्लंड आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीला आला. भारतीय गोलंदाजांनी प्रयत्न केले पण दिवस संपता-संपता भारतीयांना एकही यश मिळाले नाही. इंग्लंडने बिनबाद 43 अशी मजल मारली.
जेली बीन प्रकरण मैदानावरच मिटले असे सर्वांना वाटले होते. मात्र, झहीरच्या मनात अजून तो राग होता. दिवसाचा खेळ संपल्यावर झहीरने ड्रेसिंग रूममध्ये झहीर संतापलेलाच होता. त्याला हे देखील कळले होते की, या जेली बीन्स इयान बेलने टाकलेल्या. त्याने हा राग चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांवर काढला. सकाळच्या सत्रात ऍलिस्टर कूकला त्याने सर्वात आधी बाद केले. ऍंण्ड्रू स्ट्रॉस आणि कर्णधार मायकल वॉन यांनी संघर्ष केला. स्ट्रॉस 55 आणि वॉन 124 धावा करून झुंजत राहिले. त्यांना कॉलिंगवूडने 63 धावा करून साथ दिली. मात्र, हे सगळेजण झहीरच्याच कहरचे शिकार झाले. इंग्लंडने जोरदार प्रयत्न केला मात्र त्यांची मजल 355 पर्यंतच गेली. झहीरने 75 धावा देत 5 इंग्लिश फलंदाज वाकवले होते. जेली बीन टाकून त्याची मजा घेणाऱ्या इंग्लिश खेळाडूंना आसमान दाखवले होते. इयान बेलला शून्यावर एलबीडब्लू केल्यावर तर झहीर पूर्ण ग्राउंडवर असा पळाला की, त्याला कोणी पकडूच शकले नाही.
विजयासाठी मिळालेल्या 74 धावांच्या माफक आव्हानाचा टीम इंडियाने यशस्वी पाठलाग केला आणि मालिकेत आघाडी घेतली. पुढे जाऊन तिसरी कसोटी ड्रॉ झाली आणि भारताने 21 वर्षांचा वनवास संपवत, इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकली. या ऐतिहासिक सिरीजचा मानकरी होता अर्थातच झहीर खान!
पुढे जाऊन इंग्लिश कर्णधार वॉनने झहीरची माफी मागितली, पीटरसनने हा प्रकार गमतीत केल्याचे म्हटले, साईडबॉटमने झहीरने जास्तच रिऍक्ट केल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत झहीरने त्या गोड जेली बीन्सची चव बदलून टाकली होती.
(Jelly Bean Controversy 2007)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।