Breaking News

IND v BAN T20I: पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ‘वन साईड’ विजय, गोलंदाजांच्या धारीसह फलंदाजांचाही वार

ind v ban t20i
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजांनी बांगलादेशला केवळ 127 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी 12 षटकात संघाला विजय मिळवून दिला. अर्शदीप सिंग याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी या सामन्यात मयंक यादव व नितिशकुमार रेड्डी यांनी पदार्पण केले. भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय अर्शदीप सिंग यांनी योग्य ठरवला. त्याने पहिल्या व तिसऱ्या षटकात दोन गडी बाद करत भारताला सामन्यात पुढे केले. त्यानंतर वरून चक्रवर्ती व मयंक यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. बांगलादेशची अवस्था यावेळी पाच बाद 57 अशी केली.

चार वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या चक्रवर्ती याने तीन बळी मिळवत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. बांगलादेशसाठी मेहदी हसन मिराज याने सर्वाधिक 37 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेश संघ 127 पर्यंत पोहोचू शकला.

विजयासाठी मिळालेल्या 128 धावांचा पाठलाग करताना भारताला अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांनी दोन षटकातच 25 धावांची सलामी दिली. अभिषेक धावबाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने 14 चेंडूवर 29 धावा कुटल्या. तर संजूने 29 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या याने त्यानंतर भारताचा डाव संपवण्याची जबाबदारी घेतली. त्याने केवळ 16 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. त्याला नितिशकुमार रेड्डी याने 16 धावा काढत साथ दिली. भारताने 49 चेंडू राखून हा सामना आपल्या नावे केला. तीन बळी मिळवणारा अर्शदीप सामनावीर ठरला.

(IND v BAN T20I India Beat Bangladesh)

Exit mobile version